कामगार चळवळ

 कामगार चळवळ

                      


प्रस्तावना :

           उत्पादन प्रक्रियेत कामगाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कामगार उत्पादनाच्या प्रक्रियेत भाग घेतो. त्याचा मोबदला त्याला वेतनाच्या किंवा मजुरीच्या स्वरूपात दिला जातो. परंतु त्याला मिळणारा कामाचा मोबदला योग्य असतोच असे नाही. कधी-कधी कामगाराला फार मोठ्या प्रमाणात काम करावे लागते. तरीही त्याला त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही व इतर फायदे मिळत नाही. अशावेळी कामगाराला वाटते, की आपल्याला आपल्या कामाचा मोबदला व इतर फायदे मिळवून देण्यासाठी कोणी तरी पाहिजे. यातूनच कामगारांचे संघटन होऊन कामगार संघटना निर्माण होत असतात.


 खानदेशची भौगोलिक व औद्योगिक पार्श्वभूमी :

        यातूनच खऱ्या अर्थाने कामगार चळवळ उभी राहिली. यात खानदेशातील जळगाव जिल्हाही अपवाद नव्हता. "प्रशासनाच्या सोयीनुसार प्रादेशिक रचनेत बदल होत असताना आज आपण ज्याला खानदे म्हणून ओळखतो तो कधीकाळी मोठा विस्तृत भूप्रदेश होता." खानदेश नावाबद्दल इतिहासात विविध प्रवाह आहेत. तथापि, १९०६ मध्ये खानदेशचे पूर्व खानदेश व पश्चिम खानदेश असे दोन भाग करून जळगाव व धुळे असे दोन भाग करण्यात आले.

                


        विद्यमान जळगाव जिल्हा केळी व कपाशी पिकासाठी प्रसिद्ध आहे. कापसाचे मुबलक उत्पादन पुरेसे मजूर उपलब्ध होण्याएवढे शेती कामगार आणि दळणवळणाची सोय म्हणून उपलब्ध रेल्वेमार्ग आणि सडका असा खानदेशातील भौगोलिक पार्श्वभूमीला जोड मिळाली ती तत्कालीन राजकीय पार्श्वभूमीची. लोकमान्य टिळकांनी नुकतीच स्वदेश चळवळ सुरू केली होती. स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात होते. हा स्रोत लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात विविध उद्योगांबरोबर कापड गिरण्या सुरू झाल्या. में १८४० मध्ये शासनाने ग्रँट यांना खानदेशातील बटन व दावी कारखाना काढण्याची परवानगी देऊन इंग्लंडमधून कापूस बटन व दाबणी यंत्र आयातीसाठी ५०,००० रुपये बिनव्याजी कर्ज मंजूर केले. इ.स. १८४४ मध्ये गोरखपूरचे ब्लॉट व मद्रासचे झिम्पसन या दोन अमेरिकन मळेवाल्यांची खानदेशात कापूस प्रयोग अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी धरणगाव व जळगावला अशा बटन यंत्राची उभारणी केल्यावर कापूस बटणी करून ४ ते ५ पौंड कापूस वस्त्रे चेंबर्स ऑफ कॉमर्सकडे पाठविला. तो गुणवत्तेच्या दृष्टीने चांगला ठरला. यामुळे ही यंत्रे लोकप्रिय होऊन जिल्ह्यात त्याचा उपयोग सर्वत्र होऊ लागला. "खानदेशची औद्योगिक पार्श्वभूमी लक्षात घेता १८६० पूर्वी सुद्धा खानदेशात ४०० हातमाग होते. ११ स्टीम इंजिने होती. या पार्श्वभूमीवर खानदेशात पहिली कापड गिरणी मुंबईचे उद्योगपती मूळजी जेठा यांनी जळगाव शहरात १८७३ मध्ये सुरू केली. नंतर ती खानदेश मिल म्हणून ओळखली जाऊ लागली. दुसरी गिरणी चोपड्याचे प्रतापशेठ यांनी अमळनेरला १९०६ ला सुरू केली. नंतर ती प्रताप मिल म्हणून नावारूपास आली. पहिल्या महायुद्धाच्या काळात टंचाईचा परिणाम म्हणून कापड विक्रीतून प्रचंड नफा प्रतापशेठ यांना मिळाला. त्यातूनच १९२३ ला प्रताप मिलच्या आवारातच अमळनेरला दुसरी गिरणी उभारली गेली. २० व्या शतकाच्या सुरूवातीलाच चाळीसगावला प्रसिद्ध व्यापारी नारायण बंकट बुंदेलखंडी यांनी जिनिंग व प्रेसिंग मिल उभारली. १९२३ ला याच आवरात त्यांनी कापड गिरणीची स्थापना केली. नंतर हीच गिरणी लक्ष्मीनारायण कापड गिरणी म्हणून नावारूपाला आली. तसेच १९२२ मध्ये जळगाव शहरात एक भांडवलदार श्री. सेठ भगीरथ रामचंद्र यांनी कापड गिरणी सुरू केली. ही दुसरी कापड गिरणी भगीरथ मिल म्हणून ओळखली जाऊ लागली. अवघ्या १० वर्षांतच ही गिरणी डबघाईला आली असल्याने मूळ मालकाने इंदूरचे व्यापारी गेंदालाल सुखमल यांना विकून टाकली. नंतरच्या काळात ह्याच गिरणीला लोक गेंदालाल मिल म्हणून ओळखू लागले. यातील १९२३ ला अमळनेरला प्रतापशेठ यांनी जी दुसरी गिरणी सुरु केली त्यात जे फ्लाय व्हील बसवले त्याचा उल्लेख टाइम्स ऑफ इंडियाने जगातील सर्वात मोठी पुली म्हणून केला होता, हे विशेष! त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यात हायड्रोजन प्लाँट वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ, अमळनेर, धुळे, पाचोरा येथील वनस्पती तुपाचे कारखाने, जी.आय.पी.रेल्वे, विविध स्वरूपाचे उद्योग आणि त्यात काम करणारा कामगार वर्ग असे औद्योगिक वातावरण खानदेशात प्रस्थापित झाले. जगातील कामगारांचा प्रमुख वर्ग कार्ल मार्क्स यांनी सांगितल्याप्रमाणे स्वाभाविकपणे मालक वर्गाची प्रवृत्ती पिळवणुकीची बनत गेली. खानदेशातील मालक वर्गाची प्रवृत्ती आणि कामगारांच्या समस्या इतरांपेक्षा वेगळ्या नव्हत्या. कामगारांचे कामाचे तास, वेतन, उशिर करणे, कामगारांना उपलब्ध असलेल्या सुखसोयींचा अभाव, बदली कामगार उपलब्ध झाल्याने मालक व कामगार संघटनेत उभा राहिलेला संघर्ष व इतर अशा असंख्य कारणाने कामगारांची मने दुखावली जात होती. मुंबई व इतर शहरांतून जो कुशल व अकुशल कामगार वर्ग खानदेशात आला होता तो जागृत होता. अमळनेरच्या प्रताप मिलमध्ये वेतनाला उशीर झाला म्हणून गिरणीतील सर्व कामगार काम सोडून बाहेर पडले. ही खानदेशातील पहिली कामगार चळवळ होती.

Post a Comment

0 Comments