असंघटित क्षेत्रातील कामगार संघटना :
महाराष्ट्रामध्ये कामगार संघटनांनी फार मोठी आंदोलने उभारली आहेत. परंतु सध्याच्या काळात या चळवळी मंदावलेल्या दिसत आहेत महाराष्ट्रातील मुंबई येथे १९२८ मध्ये गिरणी कामगारांचा संप ६ महिने चालला होता. या संपात सहभागी झालेले कामगार व नेते यांच्यात कणखरपणा होता.
महाराष्ट्रामध्ये १९७०-८० च्या दरम्यान ग्रामीण श्रमिकांना संघटित करणाऱ्या अनेक संघटनांचा उदय झाल्याचे दिसते. या संघटनांनी ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी व श्रमिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले.
१) महाराष्ट्र राज्य शेतमजूर परिषद -
अवर्षणाविरुद्ध ग्रामीण गरिबांना संघटित करण्याच्या हेतूने १९७१ मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात दत्ता देशमुखसारख्या लाल निशाण पक्षाच्या नेत्यांनी या पक्षाशी निगडित अशी महाराष्ट्र शेतमजूर नावाची ग्रामीण कामगार संघटना स्थापन केली.
२) युवक क्रांती दल -
पुण्यातील एक विद्यार्थी संघटना म्हणून १९६९ मध्ये युक्रांदची सुरवात झाली. प्रारंभी महाराष्ट्रातील महाविद्यालये व विद्यापीठ यातील विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यात ती कार्यरत होती. विद्यार्थ्यांना विशेषतः दलितांसारख्या वंचित समूहांना भेडसावणाच्या समस्यांची त्यांना जाण होती. यासाठी त्यांची चळवळ होती. त्यांची सरकारकडून अपेक्षा होती, की कसणाऱ्याला जमीन देणे, जमीन धारणा कायद्याखाली हस्तगत केलेली सामायिक संसाधने व चराऊ जमिनीचे भूमिहीन व दलितांमध्ये वाटप करणे, किमान वेतन पुरविणे, कर्ज माफ करणे, दुष्काळ निवारण कार्यक्रमांची व्याप्ती वाढविणे व जमीनदारी नष्ट करून दलितांना सर्व प्रकारच्या दास्यातून मुक्त करणे.
१९८० च्या दशकात सुरवातीला युक्रांदने गावागावात लोकसमित्या स्थापन करून रोजगार हमी योजनेच्या कामाचे स्वरूप ठरविणे, कामाचे ठिकाण निवडणे व वेळेवर किमान वेतन देण्याचे पालन करणे, याविषयीचे निर्णय अधिकार या समित्यांना दिले. चराऊ व जंगल जमीन सरकारने भूमिहीनांच्या नावे नोंदावी. यासाठी दबाव आणणे. गावठाण व चराऊ जमिनीवर हक सांगणे व जमीन बळकाव चळवळी उभारणे यासारख्या मोहिमा हाती घेतल्या.
३) श्रमिक संघटना -
१९६७ मध्ये पुण्यात मागोवा या मार्क्सवादी विद्यार्थी गटाची स्थापना झाली. गोदावरी परुळेकरांच्या नेतृत्वाखाली किसान सभेचे लढे व काही गांधीवादी गट, प्रजा समाजवादी पक्ष व भूमी सेनेसारख्या संघटनेच्या कामाच्या पार्श्वभूमीवर मागोवाने ठाणे व धुळे जिल्ह्यात काम सुरू केले. पूर्वी सूर्योदय मंडळाशी निगडित असलेल्या अंबरसिंह सुरसवंती स्थानिक आदिवासी नेत्याने धुळ्यामध्ये आदिवासींना संघटित केले. सर्वोदय तत्त्वज्ञानाबद्दल भ्रमनिरास होऊन त्यांनी ग्रामस्वराज्य समिती स्थापन करून भू-मुक्ती आंदोलन सुरू केले. जानेवारी १९७२ मध्ये अंबरसिंहांच्या चळवळीत मारगोवा कार्यकर्ते सामील झाले. जून १९७२ मध्ये मागोवा कार्यकर्त्यांनी श्रमिक संघटना स्थापन केली.
४) कष्टकरी संघटना -
मुंबईतील कॅथॉलिक चर्चच्या सदस्यांनी १९७९ मध्ये कष्टकरी संघटना स्थापन केली. संघटेने संस्थापक प्रदीप प्रभू, विकी काड़रोसो व सुशीला डिसोझा या ठाण्यातील तलासरी तालुक्यातील खिश्चन मिशनमध्ये या आधी काम केले होते. लिबरेशन थिऑलाजीने प्रभावित झालेल्या या नेतृत्वाने आदिवासींवर होणारी हिंसा व त्यांच्या शोषणाबद्दल निष्क्रिय राहण्याबद्दल टीका केली. ज्यामुळे त्यांनी या संघटनेचे आदिवासीव्यतिरिक्त बांधकाम, मिठागारातील, भट्ट्यांवरील असंघटित कागारांसाठी काम केले.
५) श्रमजीवी संघटना -
विवेक पंडित व विद्युलता पंडित यांनी ऑक्टोबर १९८२ मध्ये कामगार संघटना म्हणून श्रमजीवी संघटना सुरू केली. त्या आधी १९७९ मध्ये त्यांनी मुंबईतील दहिसर येथील झोपडपट्ट्यांमध्ये काम करणारी विधायक संसद नावाची एनजीओ स्थापन केली. येथे काम करीत असताना त्यांना आदिवासींमधील वेठबिगारीबद्दल कळल्यावर त्याविषयी एक जनहित याचिका दाखल करून त्यांनी १९६२ मध्ये काही वेठबिगारांना सोडविले.
संदर्भ : महाराष्ट्रातील चळवळी : सामाजिक आणि राजकीय
0 Comments