जागतिकीकरणाचा भारतीय समाजावर परिणाम (Impact of Globalization on Indian Society)
भारतात २० व्या शतकांच्या शेवटच्या दशकात जागतिकीकरणाची प्रक्रिया, सुरू झाली. ही प्रक्रिया कार्यान्वित होऊन फक्त दीडदशकाचा कालावधी झाला असला तरी जागतिकीकरणाचे परिणाम भारतीय समाजावर ठळकपणे दिसत आहे. या संदर्भात दोन विचारसरणी विद्यमान आहेत. एका मताप्रमाणे भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे सकारात्मक परिणाम होत आहेत. तसेच दुसऱ्या मतप्रवाहाप्रमाणे जागतिकीकरणाने भारतीय समाजावर नकारात्मक परिणाम होत आहेत. येथे आपण आरंभी सकारात्मक परिणामाचा विचार करू आणि त्या नंतर नकारात्मक परिणामाचा आढावा घेऊ.
आधुनिक युग हे जागतिकीकरणाच्या प्रभावाचे युग आहे. तसेच ती एक अपरिहार्य प्रक्रिया आहे. प्रगत राष्ट्रांमध्ये सुरू झालेल्या या प्रक्रियेपासून विकासोन्मुख व अविकसित राष्ट्र वेगळी राहू शकत नाही. राष्ट्राचा विकास साधावयाचा असल्यास जागतिकीकरणात समाविष्ट उदारीकरण, खाजगीकरण, माहिती तंत्रज्ञानांचा स्वीकार आवश्यक ठरला आहे. योगेंद्र सिंह यांच्या मते, 'भारतीय समाजात १९९०च्या दशकात है एक क्रांतिकारी परिवर्तन झाले आहे. जागतिकीकरण ही मूलत: आर्थिक प्रक्रिया आहे. या घटनेमुळे भारतीय समाजात अनुकूलनातमक बदल होत आहे. या बदलास त्यांनी सांस्कृतिक परिवर्तन असेही म्हटले जाते. जागतिकीकरणाचा रेटा इतके जबरदस्त आहे की, साम्यवादी विचारसरणी असलेल्या पक्षांनीसुद्धा अप्रत्यक्षपणे का होईना त्यास मान्यता दिली आहे. तसे पाहिले तर सामाजिक परिवर्तन ठळकपणे लक्षात येण्यासाठी दीर्घकालावधीची गरज असते. परंतु जेव्हा परिवर्तनाची गती जास्त असते तेव्हा अल्पकालावधीतही प्रभाव जाणवू लागतो, हे जागतिकीकरणाचे बाबतीत दिसून येते. इतके मात्र निश्चित की आणखी कालावधी लोटला म्हणजे परिणाम विशेषत्वाने नजरेत येतील.
(१) सामाजिक परिवर्तन - जागतिकीकरणाच्या प्रभावाने भारतीय समाजातील कुटुंब, विवाह, जात, ग्रामीण समुदाय, शहरी समुदाय, आर्थिक जीवन, धार्मिक क्षेत्रे, शैक्षणिक व राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक मूल्यांमध्ये परिवर्तन झाले आहे, या प्रक्रियेमुळे औद्योगिकीकरण आणि शहरीकरणास गती मिळाली. संयुक्त कुटुंबावर आघात झाले व प्रारंभिक कुटुंबाची संख्या वाढली. विवाहाचे क्षेत्र वाढले. आंतरविवाहाचे प्रमाण वाढले. परदेशात नोकरीस गेलेल्या काही मुलांनी त्या देशातील वधूची निवड केली. जाती आणि व्यवसायाचे साहचर्य संपुष्टात येण्यास मदत झाली. व्यावसायिक क्षेत्रात जन्म-जाती पेक्षा गुण लक्षात घेण्यात येऊ लागले. आधुनिक तंत्रज्ञानात पारंगत असलेल्या व्यक्तीला वरचे पद व प्रतिष्ठा प्राप्त झाली. व्यक्तीची एकू नवी ओळख निर्माण झाली. ग्रामीण समुदायात दूरचित्रवाणी, संगणक, दूरध्वनीचा वापर वाढला आहे आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव प्रत्ययास येत आहे. परंपरागत संबंधात बदल होत असून पैशाला महत्व प्राप्त झाले आहे. व्यक्तिवाद शहरी जीवनाबरोबर ग्रामीण समुदायातही दिसून येत आहे. आदिवासी अल्पसंख्याकांमध्ये नवचेतना निर्माण झाली, आहे. कारण त्यांना विपुल संधी उपलब्ध होत आहेत. सामाजिक संबंधात अप्रत्यक्ष, औपचारिक साधनमात्र आणि करारप्रधान संबंध वाढले आहे. बाजारावरील अवलंबन प्रकर्षाने दिसत आहे.
0 Comments