खानदेशातील कामगारांची चळवळ :
इ.स.१९१४ मध्ये पहिल्या महायुद्धास सुरवात झाली. या महायुद्धामुळे जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था कोलमडली. सर्व प्रकारच्या वस्तू दुर्मिळ झाल्या. कापड मिळणेही दुरापास्त झाले. याचा फायदा मात्र गिरणीमालकांना मोठ्या प्रमाणावर झाला व इतर कापड गिरण्यांप्रमाणे खानदेशातील कापड गिरण्यांना दोन वर्षात प्रचंड नफा मिळाला. अमळनेरच्या गिरणीमालकाने १०० रुपयांच्या शेअरला ४० रुपये डिव्हिडंड भागधारकांना वाटला. मजुरांच्या तोडाला पान पुसले. महायुद्ध काळातील टंचाईचा फटका मात्र खऱ्या अर्थाने कामगारांना बसलेला होता. मात्र, नफ्याचे वाटप भागधारकांना झाले म्हणून जळगावच्या खानदेश मिलचे सर्व कामगार १९१६ मध्ये संपावर उतरले. उपाय म्हणून गिरणी कामगारांना एक महिन्याचा पगार काही कामगारांना चांदीचे, तर काहींना जरीचा फेटा व रुमाल दिला. संप मिटला. हा जळगावमधील गिरणी कामगारांचा पहिला संप होता. या संपामुळे कामगारांच्या एकजुटीचे दर्शन सर्वांना झाले. याचा फायदा उत्तरोत्तर त्यांना झाला. जळगावच्या खानदेश गिरणीत कामगारांना वेतनासोबत महागाईपोटी धान्य देण्याची प्रथा होती. १९१९ ला गिरणी विणकरांनी मागणी केली, की काही भाग वाढवून मिळावा आणि त्यासाठी त्यांनी संप पुकारला. सपकांना भाग वाढवून मिळाला नाही. त्यांना संप मागे घ्यावा लागला. परंतु गिरणी कामगारांना त्यांचे कामाचे मूल्य कळायला लागले. ही फलनिष्पत्ती महत्त्वाची होती. त्याचप्रमाणे १९२३-२४ पासून मंदीचे सावट जगावर पसरू लागले. प्रथम परिणाम मुंबईवर झाला. नंतर खानदेशात त्याचा परिणाम जाणवू लागला. या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी मुंबईच्या मालकांनी कामगारांच्या पगारात कपात केली. जगाच्या पाठीवर मालक वर्गाची प्रवृत्ती समान असल्याने खानदेशातील मालकांनी याचे अनुकरण केले. जळगावची भगीरथ मिल या मंदीचा पहिला बळी ठरली. एका बाजूला कामगारांचे संप, बंद, मोर्चे दुसऱ्या बाजूला व्यवस्थापनाचा हटवादीपणा यामुळे अखेर गिरणी गेंदालालशेठ यांना विकली गेली. १९२३ ला धुळे, चाळीसगावच्या कामगारांनी या विरोधातसंप पुकारला. काळे वकील व इतर प्रतिष्ठानांनी हस्तक्षेप केला आणि मालकाने थोडी माघार घेतली. असाच प्रकार ऑगस्ट १९३३ मध्ये येथील गिरणीत झाला. वेळेवर पगार देण्याची कामगारांची मागणी मालकाला मान्य करावी लागली. अमळनेर गिरणीतही हे संपाचे फोन येऊन पोहोचले. सतत ४ महिने संप चालला. धुळ्याच्या गिरणीत ७ जानेवारी १९३८ ला कामगारांनी पगार वाढीसाठी कामावर बहिष्कार टाकला. गिरणी बंद पडली. ८ दिवसांच्या संपानंतर तडजोड झाली. असाच प्रकार जळगावच्या गेंदालाल मिलमध्ये झाला. पण तेथे अपयश आले. कामगारांना स्वतःहून कामावर जावे लागले. त्याचप्रमाणे ३ मार्च १९३८ पासून धुळे गिरणी कामगारांनी बैठा संप पुकारला होता. खानदेशातील सुमारे १०,००० कामगार अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढू लागले. वेळोवेळी दररोज आपापल्या कामगार सभा, मिरवणुका काढू लागले. ऑगस्ट १९३८ मध्ये धुळ्याच्या प्रताप मिलमध्ये ६ साचे बंद पडल्याने व्यवस्थापनाने ५१ कामगार कमी केले.
कामगार संघाच्या मते ४१ कामगार कमी करणे गरजेचे होते. १० स्त्रिया परत कामावर घ्याव्यात. व्यवस्थापनाने ही मागणी अमान्य केल्याने सर्वच कामगार बाहेर पडले. गिरणी बंद केली. साने गुरुजी कामाला लागले. एस. एम. जोशी, कॉ. थत्ते आले. सभेमध्ये भाषणे झाली. कामगार नेत्यांनी मजूर मंत्र्याची भेट घेतली. पण उपयोग झाला नाही. १० ऑक्टोबरला साने गुरुजींनी जाहीर सभा घेऊन घोषणा केली, की १३ ऑक्टोबरपर्यंत गिरणी सुरू झाली नाही, तर आपण तापी नदीत जलसमाधी घेऊ तोवर उपोषण सुरूच राहील, मग मात्र मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातले आणि शेवटी १४ तारखेला तडजोड झाली. फेब्रुवारी १९३९ चाळीसगावच्या गिरणीतही कामगारांनी पगारवाढीबरोबर इतरही मागण्या केल्या. मालक वर्गाने त्या ३५ कामगारांना कमी केले. तर सर्व कामगारांनी १६ फेब्रुवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले. अमळनेरला राष्ट्रीय मजदूर संघाची स्थापना ७/५/१९४७ रोजी झाली. जळगावला श्री. भट यांनी राष्ट्रीय मिल मजदूर संघाची, तर धुळ्याला नेणे यांनी, तर चाळीसगावला के. डी. पाटील यांनी या संघटनांची स्थापना केली. प्रांतिकस्तरावर या संघटना संलग्नित केल्या, तर राष्ट्रीय स्तरावर इंटकशी संलग्नित केल्या. १९५0-६० या कालावधीत एका बाजूला बिघडते. औद्योगिक संबंध कारखान्यांची कालबाह्य झालेली जुनी यंत्रे यामुळे उत्पादनात सतत घट होत गेली. दुसऱ्या बाजूला कामगार संरक्षण कायद्यामुळे कामगारांना द्यावे लागणारे वाढीव वेतन, आर्थिक सोयी यामुळे आर्थिकदृष्ट्या खानदेशातील कापड गिरण्या गटांगळ्या खाऊ लागल्या. यामुळे गिरण्या चालविणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही, असे दिसल्यावर मालक वर्ग गिरण्या बंद करण्याच्या दिशेने पाऊल टाकू लागला. यात १९५४ ला जळगावची मिल बंद पडली, तर जळगावची खानदेश मिल १९७७ मध्ये सुरेश जैन यांना विकली गेली. १९६० पासून धुळे आणि अमळनेर तसेच चाळीसगाव येथील कापड गिरण्या शासनाने वेळोवेळी वेगवेगळ्या भांडवलदारांना वेगवेगळ्या कराराने चालविण्यास दिल्या. पण शेवटी अपयश आल्याने १९७० ला महाराष्ट्र शासनाने या गिरण्या ताब्यात घेतल्या. नंतर धुळे, चाळीसगाव, अमळनेरच्या गिरण्या महाराष्ट्र वस्त्रोद्योग महामंडळ यांनी चालविण्यास घेतल्या. १९५० ते १९७० या वीस वर्षाच्या काळात खानदेशातील कापड गिरण्या आर्थिक संकटात सापडल्या व त्या अखेर बंद पडल्या. गिरण्या बंद झाल्यामुळे खानदेशातील कामगार विस्थापित झाले. याच कालावधीत राजकीय नेते म्हणून मिरवू लागले. त्यांनी कामगार संघटन राज्य शासनाच्या दावणीला बांधल्या. त्यात धुळ्याचे नेणे, अमळनेरचे दाजीबा पाटील, चाळीसगावचे के. डी. पाटील, तर जळगावचे सुरेश जैन असे कामगार व राजकीय नेते होते. ही मंडळी शासनाला अडचणीत आणू शकत नव्हती, तर त्यांनी कामगारांना अडचणीत आणले आणि खानदेशातील कामगार चळवळ संपुष्टात आणली.
0 Comments